ऐतिहासिक पुरावे-आख्यायिका

प्रास्ताविक :- ऐतिहासिक विश्वासार्ह पुरावा सादर करणारे संदर्भ त्यामानाने कमी उपलब्ध झाले. त्यांपैकी कुलग्रंथाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे संदर्भ उपलब्ध झाले ते असे :

(अ) केळ्ये – मजगाव येथील शांडिल्य गोत्री श्री. भालचंद्र विष्णु सहस्रबुद्धे यांच्या संग्रहातून मिळालेले श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी इसवी सन १७७६ व १७७७ मध्ये दिलेल्या तीन निवाडा पत्राच्या अस्सल प्रतींवरून झेरॉक्स केलेली, मूळ मोडी लिपीत लिहिलेली व पुण्याच्या श्री. प. क. जोशी यांनी बाळबोधीतून करून दिलेली तीन निवाडा-पत्रे व त्यांचे मराठी तर्जुमे.

(ब) भाजेकर सहस्रबुद्धे यांना इसवी सन १७३१ साली श्रीमंत राजे शाहू छत्रपती स्वामी यांनी दिलेली मावळ प्रांतातील जमिनीची २ इनामपत्रे.

(क) इसवी सन १७९० साली श्री. आपाजी गणेश सहसबुद्धे यांना मिरज संस्थानाधिपतींनी महाजनकीची दिलेली सनद आणि ज्यामुळे सहस्रबुद्धे यांचे महाजन झाले त्या मूळ सनदेची झेरॉक्स कॉपी त्याच्या बाळबोधी भाषांतरासह.

(ड) इसवी सन १८३८ मध्ये सांगलीच्या राजे श्री चिंतामणराव पांडुरंग यांनी श्री. गोपाळ भास्कर सहस्रबुद्धे यास उगार या गावी जमीन बक्षीस दिल्याचे आज्ञापत्र.

(ई) पिंपळखरे सहस्रबुद्धे यांच्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रोपाध्याय यांच्याकडील नोंदी.

वरील पाचही मूळ मोडी लिपीत असलेल्या दस्ताऐवजांच्या झेरॉक्स प्रतीच्या नकला त्यांच्या बाळबोधी रूपांतरासह या प्रकरणात प्रविष्ट केल्या आहेत.

(फ) याव्यतिरिक्त वाईकर सहस्रबुद्धे या नागपूर येथील कै. श्रीराम अच्युत सहस्रबुद्धे यांनी १९९० मध्ये सायक्लोस्टाइल पद्धतीने छापलेल्या कुलग्रंथात प्रसिद्ध केलेली इसवी सन १७५० ते १७८३ पर्यंतच्या काळातील श्रीमंत थोरले माधवराव व श्रीमंत सवाई माधवराव यांनी दिलेली वर्षासनांची सात आज्ञापत्रे. या आज्ञापत्रांचे मराठी रूपांतर वरील ग्रंथातील प्रकरण चारमध्ये समाविष्ट असून ती जशीच्या तशी येथे उद्धृत केली आहेत.

वरील सर्व अस्सल पुराव्यांपैकी कुलग्रंथाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे पुरावे, केळये-मजगावच्या वर (अ) कलमाखाली उद्धृत केलेल्या चार सनदांत आहेत. या चारही सनदांतून एकत्रित केलेला गोषवारा समजुतीच्या सुलभपणासाठी येथे देत आहो.

आपाजी हरि, राघोबल्लाळ व कासी परशराम हे तीन चुलत भाऊ केळये-मजगाव वंशवृक्षातील मूळ पुरुष गणेश यांचा मुलगा कृष्ण गणेश यांच्यापासून आठव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. वरील सनदेमध्ये आपल्या फिर्यादीची पूर्वपीठिका नोंदविताना जी माहिती झाली त्याप्रमाणे मूळ पुरुषाचे मुलगे श्री. कृष्णाजी गणेश, शांडिल्य गोत्री, सहस्रबुद्धे यांना पातशहा यांनी विशाळगड व महिपतगड अमलाखालील काही भाग इनाम करून दिला. कोकणातील आदिलशाहीचा अम्मल सामान्यत: १४९० ते १६८६ असा मानला जातो. वरील दोन सनदा श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्या कार्यकाळातील इ.स. १७८६च्या आहेत. या काळात पेशवे किंवा करवीरकर यांच्या सत्ता काही वेळी एकमेकांत फिरत असत. वरील दोन्ही सनदा विशाळगड व महिपतगड या दोन्ही भागातील देशमुखी कायम करण्यासंबंधी आज्ञापत्रे आहेत. या माहितीवरून एक गोष्ट सिद्ध होते की, मूळ पुरुष कृष्ण गणेश सहस्रबुद्धे यास देसाई- देशमुखी वतने आदिलशहाच्या काळात दिली गेलेली आहेत. ती वतने तशीच आठ पिढ्या चालत आली. या दोन्ही सनदा इ.स. १७७७ च्या आहेत. साधारणपणे २५ वर्षांची एक पिढी मानली जाते. या हिशेबाने कृष्ण गणेश (देसाई) सहस्रबुद्ध याचा कार्यकाल इ. स. १५७७ च्या आसपास असावा. म्हणजेच सहस्रबुद्धे हे उपनाव त्याआधीपासून असावयास पाहिजे

वरील विधानास आणखी उत्तम पुष्टी मिळते ती सवाई माधवराव पेशवे यांनी इ.स. १७७८ साली दिलेल्या दुसर्या एका निवाडापत्राने. मूळ पुरुष कृष्ण गणेश यांना पाच पुत्र होते. वास्तविक त्यांच्यानंतर सर्व मिळकतीचे पाच भाग व्हावयास पाहिजेत, परंतु तिसऱ्या पिढीचे एक प्रतिनिधी नार देसाई-सहस्रबुद्धे निपुत्रिक वारल्यामुळे व उरलेल्या चार भावांपैकी एक भाऊ घाटावर जाऊन ‘परागंदा’ झाल्यामुळे जे तीन वाटणीदार कायम झाले. त्यांच्या भाऊबंदकीच्या वादात हे प्रकरण श्रीमंत माधवराव पेशवे यांच्याकडे न्याय मागण्यासाठी दाखल झाले. ही फिर्याद श्री. सदाशिव कृष्ण देसाई-सहस्रबुद्धे यांनी दाखल केलेली होती. याही फिर्यादीतील पूर्वपीठिका जवळजवळ पूर्वीच्या निवाडा पत्राप्रमाणेच नोंदवली आहे. या निवडापत्रामुळे सहस्रबुद्धे हे उपनाव आदिलशहाच्या काळात कृष्णाजी गणेश यास इ. स. १५५० च्या आसपास मिळाले असावे. कृष्णाजी गणेश यांचा कार्यकाल १५५० असा धरल्यास त्याचे वडील गणेश यांचा काल त्यांच्या मागे कमीत कमी २५ वर्षांनी मागे म्हणजे १५२५ हा धरावा लागेल. आपल्याकडे जमलेल्या अनेक आख्यायिकांत शांडिल्य गोत्री सहस्रबुद्धे हे मूळ पुरुष विश्वनाथ यांच्या पाच पुत्रांपैकी एक गणेश असून, विश्वनाथ यांनी चार पुत्र कोतवड्यास ठेवून धाकटा मुलगा गणेश यास केळ्ये-मजगाव येथे पाठविल्याची नोंद अनेकांनी केली आहे. याचा अर्थ असा करावा लागेल की, मूळ पुरुष विश्वनाथ याचा काळ १५०० च्या सुमाराचा असावा व विश्वनाथ यांना सहस्रबुद्धे हा किताब मिळाला व तो काळ १५२५ च्या सुमारास धरावा लागेल. अशा तऱ्हेने मूळ पुरुषाचा काळ व गणपुले यांचे सहस्रबुद्धे हे उपनाव झाल्याचा काळ १५२५ च्या सुमाराचा असावा. या विधानास वरील चार निवाडापत्रांनी विश्वासार्ह पुष्टी मिळते.

वरील पेशवेकालीन निवाडापत्रांची पुनर्नोंद इनाम कमिशनच्या कागदपत्रांत श्री. रामजी कदम, मामलेदार, तालुका रत्नागिरी यांनी ३० नोव्हेंबर १८३४ रोजी पहिले नंबरचे बुकावर ३३ पानावर नोंदविली आहे. वरील तीनही लेख व त्यांचे बाळबोधी रूपांतर येथे प्रविष्ट करीत आहोत.

(ड) या सनदेतील पुराव्यास अनुसरून उगार येथील जमीन गोपाळ भास्कर यास दिलेल्या या सनदेची माहिती श्रीमती लीला नारायण सहस बुद्धे यांनी नोंदविलेल्या आख्यायिकेशी जुळती आहे.

यापुढील पुरावे पिंपळखरे-सहस्रबुद्धे (नित्युंदन) या संबंधात आहेत.

अकोल्याचे नित्युंदन गोत्री श्री. यशवंत रघुनाथ सहस्रबुद्धे यांनी त्र्यंबकेश्वर येथील क्षेत्रोपाध्यायांकडून नोंदविलेल्या लेखातून उपलब्ध करून दिला आहे. या तीन नोंदी इ. स. १७५५, १७८९ व १८५१ या काळातील पिंपळखरे-सहस्रबुद्धे या घराण्यातील पूर्वजांनी वेळोवेळी त्र्यंबकेश्वरास धर्मकार्यार्थ गेल्याचे वेळी नोंदविल्या असून त्या मूळ मोडीतील बाळबोधी तर्जम्यासह प्रविष्ट केल्या आहेत. इ. स. १७५५ च्या सर्वात जुन्या नोंदीतही उपनाव सहस्रबुद्धे, मूळ गाव पंचनदी, हल्ली. मुक्काम पिंपळखेडी, अशी नोंद केली माह. ही नोंद करणारे नारोपंत दादोबा यांनी आपले आजोबा विसाजीपंत यांचा सहस्रबुद्धे या नावाने उल्लेख केला आहे. श्री. य. र. सहस्रबुद्धे यांनी नोंदविल्याप्रमाणे विसाजीपंतांचा जन्मकाळ इ.स. १६८७ या सुमाराचा आहे. याचा अर्थ असा होतो की, नित्युंदन-सहस्रबुद्धे हे उपनाव १६८० च्या आधीपासूनचे आहे, परंतु सहस्रबुद्धे उपनाव पेशवेकाळातील असावे, असा कयास सांगणाऱ्या नित्युदन गोत्रीयांनी नोंदविलेल्या आख्यायिकेपेक्षा खूप जुने व विश्वासार्ह म्हणून पुरावा मानावा लागेल.

(फ) वाईकर सहस्रबुद्धे या शाखेच्या कुलग्रंथामध्ये सनदा, कागदपत्रे व वर्षासने या शीर्षकाखाली खालील माहिती नोंदविली आहे ती अशी : –

१) शके १६८५ इ.स. १७६३ च्या सुमारास गोविंदभटांनी असा विचार केला की, आपले उतारवय होत आले व ज्याअर्थी मोठ्या घरास सुरुवात झाली त्याअर्थी आपण वाईचे स्थायिक रहिवाशीही झालो. तेव्हा आता सरकारातून मिळत असलेल्या नेमणुकीबद्दल लेखी सनद घेऊन काहीतरी कायमची तजवीज करून ठेविली पाहिजे व त्याप्रमाणे त्यांनी श्री. माधवराव यांना खुद्द एके दिवशी कळविलेही. तेव्हा श्रीमंतांनी कृपाळू होऊन मौजे चांडगाव येथील जहागिरी अंमलाचे कमाविसदार यास जे आज्ञापत्र दिले ते येणेप्रमाणे :

३०० रुपयांच्या वर्षासनाबद्दल हुकूम

“शके १६८५ इ.स. १७६३ अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री भगवंतराव रामगोसावी यांस सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सुरु आईसितेन मह्यव अल्लफ मौजे चांडगाव प्रगणे कडेवलीत येथील जहागिरीचे अंमलाची कमावीस पेशजीप्रमाणे तुम्हाकडेच करार करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असे, तर इमानेइतबारे वर्तोन, अंमल चौकशीने करून मौजे मजकूर येथील जहागिरीचे अंमलाचा आकार होईल त्यापैकी धर्मादाय देणे ब्राह्मणास रुपये :

३०० वे. रा. विरेश्वर दीक्षित यांस

३०० वेदमूर्ती राजश्री गोविंदभट्ट पुराणिक यांस
६००

एकूण सहाशे रुपये उभयतांस सालदरसाल धर्मादाय पावते करून बाकी ऐवज राहील तो सरकारात पावता करून पावल्याचे जाब घेत जाणे, तेणेप्रमाणे मजुरा पडेल जाणिजे. छ २९ जमादिलाखर-बहुत काय लिहिणे मार्तवा असे.”

२) मराठी अंमलात न्यायदानाची पद्धती शास्त्रीय काटेकोरपणाच्या दृष्टीने निर्दोष नसली तरी आजच्या मानाने कमी खर्चाची व कामे झटपट निकालात काढणारी अशी होती. दिवाणी फिर्यादीचा निकाल करण्याचे काम खेडेगावातील पंचाकडे असे. पंच ग्रामपंचायतीत फुकट काम करीत व पंच निवडून येणे बहुमानाचे समजत असत. त्यावेळी वकिलाची जरूर लागत नसे. पंच साक्षीदारांचे पुरावे घेत व निकाल देत. सर्व खटल्यांचे निकाल पेशव्यांच्या नावाने होत. अशाच एका खटल्याचे वेळी आमचे पूर्वज गोविंदभट्ट हे एक पंच होते. त्याबद्दलचा लेख पेशवेदप्तर पुस्तक ४३ लेखांक ३८ यात दिला आहे तो येणेप्रमाणे –

“श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांप्रति

आश्रित कृपास्वामी वास्तव्य उमामहेश्वर संनिध कुंभकोण आशीर्वाद विनंती उपरी आम्ही वैद्यक पढलो नसता करीत होतो. त्यास सरकारातून आज्ञा जाहलीजे, वेद्यक का नये आणि कोणासही औषध देऊ नये, हे गोष्ट आम्हास मान्य आहे. अत:पर कोणास औषध देऊ तरी सरकारचे गुन्हेगार वैद्यक करणार नाही. मिती शके १६९४ इ. स. १७७२ नंदननाम संवत्सरे चैत्र कृष्ण त्रयोदशी.

उपरि लिखितं यत्तत्सत्यमेव एतदिषये शपथपूर्वको निश्चियोस्ति.

साक्षी

बाळकृष्णशास्त्री

जनार्दनशास्त्री गाडीगिल:

नृसिंहशास्त्री

काशिनाथशास्त्री दिवेकर:

ज्योतिर्विन्महादेवांतर्वाणी

सहस्रबुद्धुपाव्हय गोविंदभट गोचरो यमर्थः .

टीप – “यापुढील मजकूर व साक्षी बालबोध असून त्या निरनिराळ्या वळणाच्या आहेत.”

३) गोविंदभटांना वर्षासनाबद्दल मिळालेली सनद

राजश्री कमाविसदार वर्तमान व भावी मौजे चांडगाव तालुके पेडगाव प्रगणे कडेवलीत गोसावी- यांसी

स्ने।। माधवराव नारायण प्रधान आशीर्वाद व नमस्कार सु।। सबैन मयाव अल्लफ शके १६९७ (इ.स. १७७५) मन्मथ नाम सवत्सरे वेदमूर्ति रा. गोविंदभट बिन हरभट पुराणिक उपनाम सहस्रबुद्धे गोत्र शांडिल्य सूत्र आश्वलायन यांनी हुजूर कसबे पुणे येथील मुक्कामी येऊन विदित केले की आपणास मौजे मजकूर येथील जहागिरीचे ऐवजी धर्मादाय वर्षासन सालीना रुपये तीनशे करार करून दरसाल पाववीत जाणे म्हणून रा. भगवंतराव राम यांस सनसलाससितेनात सनद सादर जाहली त्याप्रमाणे चालत आहे, परंतु आपले जवळ भोगवट्यास सनद असावी यास्तव स्वामींनी कृपाळू होऊन भोगवट्यास सनद करून दिली पाहिजे म्हणून त्याजवरून मनात आणून पेशजीप्रमाणे मौजे मजकूर येथील जहागिरीचे ऐवजी धर्मादाय वर्षासन रुपये ३०० करार करून देऊन हे सनद सादर केली असे. तरी मौजे मजकूर पैकी जहागिरीचे ऐवजी सदरहू तीनशे रुपये पेशजीपासून पाहत आहोत. त्याप्रमाणे साल दरसाल पाववीत जाणे. दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे. या सनदेची प्रति लिहून घेऊन हे अस्सल सनद वेदमूर्तीजवळ भोगवट्यास परतोन देणे जाणीजे छ. २३ ज।। खर आज्ञा प्रमाण (लेखन सीमा)

४) वर्षासनाच्या वाटणीबद्दल सनद

राजश्री कमाविसदार वर्तमान व भावी मौजे चांडगाव तालुके पेडगाव प्रगणे कडेवलीत गोसावी ……… यांस

सेवक माधवराव नारायण प्रधान आशीर्वाद व नमस्कार सुरुतिसासबेन मयावअल्लप शके १७०० (इ. स. १७७८) विलंबी नाम संवत्सरे वेदमूर्ति रा. रामभट सहस्रबुद्धे वास्तव्य कसबे वाई यांनी हुजूर येऊन विदित केले की आपल्यास व आपले बंधू गोविंदभट यांस सरकारातून मौजे मजकूरपैकी पेशजीपासून धर्मादाय तीनशे रुपये पावतात त्यास विभक्त झाल्यानंतर निमेनिमप्रमाणे उभयंतांकडे पावत आले. अलीकडे दोन-तीन वर्षे निम्मे ऐवज द्यावयास गोविंदभट दिक्कत करितात. त्यास विभक्त झाल्यानंतर निमेनिम पावत आल्याचा दाखला मनात आणून भोगवट्यास पत्र करून देऊन चालविले पाहिजे. म्हणून त्यावरून मनात आणता विभक्त झाल्यानंतर निमेनिमप्रमाणे ऐवज पावतो त्याचा दाखला मनास आणून त्याप्रमाणे उभयंतांकडे धर्मादाय निमेनिमा प्रमाणे करार करून देऊन हे सनद सादर केली असे. तरी दीडशे रुपये रामभट यांस व दीडशे गोविंदभट यास दरसाल मौजे मजकूर पैकी ज्याचे त्यास देत जाणे. दरसाल ताजे सनदेचा आक्षेप न करणे. या सनदेची प्रत लिहून घेऊन ही अस्सल सनद भोगवट्यास रामभटजी जवळ परतोन देणे. जाणिजे. छ. २३ रजब-आज्ञाप्रमाणं. (लेखन सीमा).

॥श्री राजाराम नरपति हर्षाविधान
माधवराव नारायण प्रधान

याशिवाय कडबा पेंड्या २००० पूर्वी मिळत असत.

७) इनाम कमिशनपुढे चिंतामणशास्त्री यांनी दिलेली कैफियत

मेहरबान कलेक्टरसाहेब बहादूर जिल्हा नगर यांजकडून सन १२६० फसलीची पोलिटिकल देवस्थान वर्षासन वगैरेबद्दल यादी आली त्यात वर्षासनदार सदरात रुपये २८८ चिंतामणशास्त्री बिन विठ्ठलशास्त्री सहस्रबुद्धे वाईकर यांचे नावाने दाखल असून सदरहू इसम मजकूर कैफियत देण्याकरिता हजर जाहलेवरून त्यांची कैफियत घेणे..

सुरू तारीख १९ माहे मार्च सन १८६० इ. इसम मजकूर खुद्द चिंतामणशास्त्री बिन विठ्ठलशास्त्री वाईकर हे हजर जाहल्यावरून त्यांचे म्हणणे रुबरू आहे ते खाली लिहिल्याप्रमाणे :

१. आमचे नाव चिंतामणशास्त्री, आमचे बापाचे नाव विठ्ठलशास्त्री, आजाचे नाव रामभट, आडनाव सहस्रबुद्धे, जात ब्राह्मण, कसब भिक्षुकीचे, उमर वर्षे अदमासे ७४.

२. आमचा जन्म कसबे वाई तालुके मजकूर, जिल्हा सातारा व मूळ वतनाची जागा मौजे कोतवडे, तालुके रत्नागिरी, जिल्हा मजकूर, हल्ली राहण्याचे ठिकाण पुणे तालुके हवेली, जिल्हा पुणे.

३. हुजूर खजिना जिल्हा नगर येथील तिजोरीतून दरसाल वर्षासन रुपये २८८ मिळत असून ते वर्षासन सन १८५८ सालपर्यंत तेथून घेतले असोन गुरुदत्त साली म्हणजे एप्रिल सन १८५९ इसवी सालात सन १८५८ सालचे वर्षासन पुणे जिल्ह्याचे हुजूर खजिन्यातून घेतले. याचे कारण आम्ही वृद्ध जाहलो, त्यामुळे आमच्याने नगरास जावेना, सबब आम्ही अर्ज केला की आम्हास वर्षासन पुणे मुक्कामी मिळावे, त्याजवरून सदरहू वर्षासन गुदस्तसाली पुण्याहून मिळाले आहे. आता सदरहू वर्षासन पुणे जिल्ह्याचे हुजूर खजिन्यातून मिळावयाचे असून ते वर्षासन आम्हाकडे वंशपरंपरा चालावयाचे आहे.

४. सदरहू वर्षासन मूळ मौजे चांडगाव प्रगणे कडेवलीत पे॥ आमचे चुलत आजे गोविंदभट बिन हरभट पुराणिक यांजला पेशवे माधवराव बल्लाळ यांनी दिले. कोणते साली दिले ते पक्के आम्हास माहीत नाही, परंतु अदमासे ५५ वर्षे जाहली असावीत. असे आमचेपाशी कागदपत्रे आहेत. त्याजवरून सदरहू मौजे चांडगावयेथे रुपये २८८ वर्षासन मोरेश्वर दीक्षित मनोहर यांजला आहे त्याची व सदरहू वर्षासनाबद्दल सनद विरेश्वर दीक्षित मनोहर व आमचे चुलत आजे गोविंदभट पुराणिक यांचे नावे जाहलेली आहे. त्यात साल लागले आहे. त्यावरून मोरेश्वर दीक्षित मनोहर यांनी ५५ वर्षे वर्षासन मिळाल्यास जाहली म्हणून सांगितले त्यावरून माहीत आहे.

५. सदरहू मूळ आमचे चुलत आजे गोविंदभट बिन हरभट पुराणिक हे थोर, विद्वान, शिष्ट ब्राह्मण म्हणोन धर्मादाव मिळाले आहे. कामाकरिता मिळाले नाही. सबब काम वगैरे करावयाचे नाही.

६. सदरहू वर्षासन संपादन करणार गोविंदभट बिन हरभट हे आमचे चुलत आजे होतात.

७. ज्या दिवशी माजी अंमल दूर जाहला त्या दिवशी म्हणजे सन १२२७ फसली साली सदहूं वर्षासनाचा पैसा खुद्द आम्ही घेतला आहे.

८. सदरहू वर्षासन मिळाले दिवसापासून इंग्रजी अंमल सुरू होईपर्यंत सदरहू वर्षासन जप्त वगैरे कारणाने कधी बंद वगैरे दिक्कत जाहली नव्हती. बिनदिक्कत चालत होते. असे ऐकून माहीत आहे.

९. इंग्रजी अंमल सन १२२७ फसली साली बसला त्या दिवसापासून आजपर्यंत सदरहू वर्षासन कधी बंद वगैरे जाहले नाही. बिनदिक्कत चालत आहे.

१०. इंग्रजी अंमल सन १२२७ फसली साली बसला. त्या दिवसापासून आजपर्यंत सदरहू वर्षासनाचा पैसा खुद्द आम्ही घेतला आहे.

११. सदरहू वर लिहिलेला मजकूर खरा करण्यास आम्हांजवळ सनदपत्रे आहेत ती खाली लिहिल्याप्रमाणे :-

१. भगवंतराव राम यांचे नावे माधवराव बल्लाळ प्रधान यांचे पुत्र सुरू अर्वासीतेनम याव अल्लफचे नक्कल, सदरहूची अस्सल मोरेश्वर दीक्षित बिन यज्ञेश्वर दीक्षित मनोहर राहणार शहर पुणे ता | हवेली यांजकडे आहे ती आणून पहावी.

२. कमाविसदार वर्तमान व भावी मौजे चांडगाव यांचे नावे माधवराव नारायण प्रधान यांचे पत्र सुरुसितसेतेन मयाव अल्लफ छ २३ र ॥ खरची अस्सल.

३. सदर प्र. ।। पत्र सु ।। तीसासवैन मयाव अल्लफ छ २३ रजबचे अस्सल.

कृष्णराव भगवंत यांचे नावे माधवराव नारायण प्रधान यांचे पत्र सु।। आईस मागीन मयाव अल्लफ छ २६ र ।। खरचे अस्सल.

५. चेहरेबुकाचा उतारा हुजूर डिप्युटी कलेक्टर जिल्हा नगर यांचे सहीचा तारीख १३ जुलै सन १८५८ चा अस्सल

सर्टिफिकिट इंग्रजी, हुजूर डेप्युटी कलेक्टर पुणे यांचे सहीचे.

येणेप्रमाणे पुराव्याचे कागद असून याशिवाय आम्हापाशी सदरहू बद्दल पुराव्याचे कागदपत्रे नसोन सदरहू लिहून दिल्हे सनदेची नक्कलची अस्सल व आणखी एक सनद कोणी, कोणाचे नाव, कोणचे सालची आहे हे आम्हास माहीत नाही असे मोरेश्वर दीक्षित बिन यज्ञेश्वर दीक्षित मनोहर यांजकडे आहेत ते आणून या कैफियतीस लागू करून घ्याव. सदरहू मोरेश्वर दीक्षित हे शहर पुणे येथे राहत असोन याजकडे सनदा असल्याचे कारण त्यांचे पूर्वज विरेश्वर दीक्षित मनोहर यांस वर्षासन रुपये ३०० व आमचे चुलत आजे गोविंदभट पुराणिक यांस वर्षासन रुपये ३०० अशी एकदम मिळाली असल्यामुळे त्याजकडे कागद आहेत. दीक्षित यांनी आपले वर्षासनाबद्दल आपलेकडे कैफियत दिल्ही आहे म्हणून सांगितले आहे. त्यास सदरहूबद्दलची कैफियत जाहली असेल तर त्यात पुराव्यास सदरहू सनदा दिल्या असतील, परंतु त्याची माहिती आम्हास पक्की नाही, याशिवाय सदरहूबद्दल साक्ष वगैरे यावयाची नसोन पुरवणी मजकूरही जाहीर करावयाचा नाही.

१२. सदरहू वर्षासनांत संपादक गोविंदभट बिन हरभट यांचे वंशाकडे निम्मे हिस्सा असोन निम्मे हिस्सा आमचे आजे म्हणजे गोविंदभट यांचे सख्खे बंधू रामभट यांचे वंशाकडे निम्मे हिस्सा याप्रमाणे आहेत, याशिवाय तिसरे भावाबंदाचा सदरहू वर्षासनात हिस्सा नाही.

१३. वर्षासन संपादन करणार यांचे आजाचे नाव माहीत नसल्यामुळे संपादकाचे बापापासून इनाम कमिशनर यांचे नमुन्याप्रमाणे वंशावळ हजर केली आहे.

१४. सदरहू वर्षासन मूळ चांदवड ३०० मिळाल्यापासून पेशवाई अंमल जाहल्यावर सुती चालू होईपर्यंत सदरहूप्रमाणे पावून सुती जाहलेपासून बट्टा व्याज होऊन बाकी रुपये २८८ आजपावेतो पावत आहेत. कमीजास्ती काही एक जाहले नाही.

१५. माजी अंमलात सदरहू वर्षासन मौजे चांडगाव तालुके पेडगाव प्रगणे कडेवलीत येथील कमाविसदार यांजकडून पावत असेल. पक्के ठाऊक नाही. हाल अंमलात सदरहू वर्षासन हुजूर खजिना जिल्हानगर येथील मेहेरबान कलेक्टरसाहेब यांचे तिजोरीतून सन १८५७ सालपर्यंत घऊन सन इ. पासून हुजूर खजिना जिल्हा पुणे येथील जामदारखान्यांतून पावत आहे.

ताजा कलम – सदरील चौथे जाबात वर्षासन अदमासे ५५ वर्षे जाहली असावी म्हणन लिहिले ते बरोबर नाही. हल्ली आम्ही कागद सदरी दाखल केलेले त्यांजवरून पाहता सदरहूवर्षासन मिळाल्यास अदमासे वर्षे ९९/१०० वर्षावर दिवस जाहले असावे याप्रमाणे मजकूर आहे.

येणेप्रमाणे सवालाचे जवाब लिहून देण्यास प्रारंभ केला. तारीख १९ माहे मार्च सन १८६० इ. पुरी तारीख २० माहे सन मजकूर.

(८) इनाम कमिशनरचा हुकूम

पुरवणी वटबुक नंबर ६ जावक बारनिशी विद्यमान ग्रिफित साहेब बहादूर इनाम कमिशनर उत्तरभाग सन १८६१ यांतील चिंतामणशास्त्री बिन विठ्ठलशास्त्री यांचे नावे नंबर ३३७ तारीख १५ मार्च सन १८६२, इ. चे गेलेले पत्र बार आहे. त्याचा उतारा.

नंबर ३३७ मु पुणे तारीख १५ मार्च सन १८६२ चिंतामणशास्त्री बिन विठ्ठलशास्त्री सहस्रबुद्धे – यांस

१. देवस्थान वर्षासन वगैरे खर्च पडल्याबद्दल सन १२६० फसलीची यादी मेहेरबान कलेक्टर साहेब बहादूर जिल्हा नगर यांजकडून आली. जामखेड तालुक्याचे पोटी वंशपरंपरा सदरात चिंतामणशास्त्री बिन विठ्ठलशास्त्री सहस्रबुद्धे वाईकर असे नावाचे वर्षासन रुपये २८८ दाखल आहेत. सदरहू नेमणूक पुणे जिल्ह्यास वर्ग होऊन पावत असल्याचे पुणे कलेक्टर साहेब यांजकडून सन १८५८ चे लिस्ट वर्षासनाबद्दल आलेले आहे, त्यात ही नेमणूक दाखल आहे त्याजवरून समजते.

२. सदरहू नेमणूक पुण्याचे हुजूर खजिन्यातून त्याबाबे या खात्यांतून सर्व चौकशी होऊन सरकारास रिपोर्ट होता सरकाचा ठराव नंबर ५२२ तारीख ११ फेब्रुवारी सन १८६२ चा मेहेरबान रेव्हेन्यू कमिशनर साहेब दक्षिणभाग यांचे इंग्रजी पत्र नंबर २९३ तारीख २१ मिनहू सोबत आपला तारीख २८ रोजी इकडे येऊन दाखल जाहला. त्याजवरून तुम्हास कळविण्यात येते की सदरहू नेमणुकीबद्दल तुम्ही सनदापत्रे दाखल केलीत, त्यांत सदरहू वर्षासन वंशपरंपरा चालविण्याची शर्त नाही, परंतु माजी अंमलाचे हिशेबी दाखला पाहता ह्या नेमणुकीचा भोगवटा अखेर साठ वर्षे व तीन पुस्त होतो. सबब हे वर्षासन अव्ल इंग्रजीचे वेळेचे वहिवाटदार यांचे औरस पुरुष संततीकडे चालण्याजोगे आहे. यास्तव सदरहू नेमणुकीपैकी निम्मेचे वहिवाटदार काशिनाथशास्त्री व निम्मे नेमणुकीचे वहिवाटदार अनंतशास्त्री हे होते. सबब सालीना नेमणूक रुपये १४४ एकशेचवेचाळीस काशिनाथशास्त्री बिन विठ्ठलशास्त्री यांची औरस पुरुषसंतती कायम आहे तोपर्यंत चालेल. बाकी निम्मे नेमणूक सालीना रुपये १४४ एकशे चवेचाळीस अनंतशास्त्री बिन आबाशास्त्री यांची औरस पुरुष संतती कायम आहे तोपर्यंत चालेल म्हणून मजकूर लिहून आला तो तुम्हास कळविण्यात येत आहे. सदरहू बाबतीत मेहरबान कलेक्टरसाहेब बहादूर जिल्हा पुणे यांचेकडे लिहून गेले.

सही – ग्रिफित साहेबाची वर्षासनाबद्दल माहिती – वर्षासन संपादन करणार –

कोकणातून वाई येथे येऊन राहिलेले सहस्रबुद्धे घराण्याचे मूळ पुरुष गोविंदभट बिन हरभट पुराणिक हे होत. यांना श्री. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांचेकडून हे वर्षासन सुमारे सन १७५० पासून मिळू लागले. वर्षासनाची रकम चांदवडी रु. ३०० मौजे चांडगाव तालुके पेडगाव प्रगणे कडेवलीत हे गाव इंग्रजी अमलात (व हल्लीसुद्धा) नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात आहे. येथील जहागिरी उत्पन्नातून धर्मादाय म्हणून मिळत असत. याशिवाय राजापूर प्रांतातून २ खंडी तांदूळ व २००० पेंडी कडबाही सालीना मिळत असे. हे वर्षासन पेशवाई अंमलातं स. १७५० पासून स. १८१८ पर्यंत – ६० वर्षे व चालू इंग्रजी अंमलात स. १८१८ पासून आज स. १९४१ पर्यत १२३ वर्षे, एकूण १९१ वर्षे अखंड चालू आहे. हे याचे वैशिष्ट्य होय. इंग्रजी अंमलात याला थोडी कात्री लागली आहे ही गोष्ट खरी. इंग्रजांचे सुती रुपये चालू झाल्यापासून चांदवडी रुपये ३०० ऐवजी शेकडा ४ बट्टा वजा जाता सुर्ती २८८ चे रुपये मिळू लागले. याशिवाय स. १८६० साली जे इनाम कमिशन बसले होते त्यांनी पुराव्यात दिलेल्या कागदपत्रांत, “वर्षासन वंशपरंपरा चालविण्याची शर्त नाही,” या सबबीवर वडील घराण्यातील वर्षासनाचे अव्वल इंग्रजीचे वेळचे वहिवाटदार यांची औरस संतती कायम आहे तोपर्यंतच वर्षासन चालेल अशी कात्री या वर्षासनाला लाविली. तथापि सन १९१९ साली वर्षासन घेणारावर पोटहिस्सेदारांनी फिर्यादी लाविल्या असता पुण्याच्या कोटाने पोट हिस्सेदारांतर्फे निकाल दिला. यावरून इंग्रजी अंमलातील न्यायकोर्ट पोट हिस्सेदारांचे हक्कही देववितात ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात अशा प्रकाराचा दावा करण्याचा प्रसंग हा पहिलाच होय. या वर्षासनाबद्दल कालानुक्रमाने घडलेल्या गोष्टी खाली दिल्या आहेत :

स. १७५० वर्षासन मिळण्यास सुरुवात.

स. १७६३ थोरले माधवराव पेशवे यांचे कारकीर्दीत गोविंदभट यांस रु. ३०० देण्याबाबत चांडगावच्या कमाविसदारास दिलेले लेखी आज्ञापत्र (प्र. ३ ले. १ पहा.)

स. १७७५ सवाई माधवराव पेशवे यांचे कारकीर्दीत गोविंदभटांना वर्षासनाबद्दल मिळालेली सनद (प्र. ३ ले. ४ पहा.)

स. १७७८ वर्षासनाची वाटणी – गोविंदभट यांस रु. १५० व रामभट यांस रु. १५० (प्र. ३ ले. ४ पहा.)

स. १७८३ नागेशभट (१-५-८) यांचे नावे वर्षासनाची

सनद (प्र. ३ ले. ५ पहा.)

स. १८१८ ते १८५८ पर्यंत नगर खजिन्यातून वर्षासनाचे पैसे मिळत असत.

स. १८५१ या सालापासून वर्षासनाची रक्कम पुणे खजिन्यांतून मिळू लागली.

स. १८६२ वर्षासनाबाबत इनाम कमिशनचा ठराव (प्र. ३ले.८ पहा.)

स. १९२१ पुणे फर्स्ट क्लास सबजज्ज यांनी वर्षासनातील पोट हिस्सेदारातर्फे दिलेला निकाल.

अलीकडे गोविंदराव (१-९-१९) हे पुण्याहून वर्षासन रुपये १४४ दरवर्षी मे महिन्यात आणीत असतात ते तीनही हिस्सेदारांस त्यांना वाटून द्यावे लागते. प्रत्येक हिश्श्यास रुपये ४५ येतात व रुपये ९ पूर्वी नगरहून व हल्ली पुण्याहून वर्षासन आणण्याबद्दलचा प्रवासखर्च म्हणून आणणाऱ्याने कापून घेण्याची वहिवाट होती. अलीकडे हे वर्षासन बंद झाले आहे.

ऐतिहासिक संबंधातील आख्यायिका-दंतकथा

१) श्री सद्गुरू रावसाहेब तथा बाबामहाराज सहस्रबुद्धे यांचे चरित्र, श्रीपाद रामकृष्ण देशपांडे, नोव्हेंबर १९७८, पान ३.

“गणपुले यांचे सहस्रबुद्धे कसे झाले याविषयी एक गमतीदार आख्यायिका आहे. कोतवडे हा गाव ४०० वर्षांपूर्वी सावंत नावाच्या मराठा सरदराकडे वतन म्हणून होता. राज्य मुसलमानांचे- विजयनगरच्या बादशहाचे होते. या सरदाराची एक गाय कोतवडे येथे महालक्ष्मीचे देऊळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रोज पान्हा सोडी व घरी दूध देत नसे. त्यामुळे रागावून त्या सावंताने जो गुराखी हाता त्या बेदम मार दिला. तेव्हा गुराख्याचे बापाने त्या सावंताला प्रत्यक्ष त्या ठिकाणावर नेऊन गाईने तेथे पान्हा सोडलेला दाखाविला व नंतर गावाच्या लोकांनी तेथे महालना देवालय बांधले. अशा रीतीने महालक्ष्मी ही स्वयंभू देवता आहे असे सर्व लोक मानु लागले. पढे या सावंताबद्दल अनेक तक्रारी मुसलमान अधिकाऱ्याकडे होऊन त्या अधिकाऱ्या त्यांचे वतन काढून ते गणपुले यांचा मूळ पुरुष महादेव बिन केसो विश्वनाथ याजकडे दिले. पुढे या माणसाने गाव उत्तम व्यवस्था लावून गावाचा वसूल व्यवस्थित मुसलमान अधिकाऱ्याकडे पोहोचविण्याची व्यवस्था केली म्हणून त्याला सहस्रबुद्धे म्हणू लागले.”

“सहस्रबुद्धे यांची मूळ पिठीका म्हणून तेथील लोक एक कथा सांगतात ती अशी – मूळ पुरुष महादेवभट्ट बिन केसो विश्वनाथ सहस्रबुद्धे हे चतुर्बेटावर प्रथम आले. त्यांना दोन बायका. वडील बायकोस तीन पुत्र होते त्यापैकी दुसरा पुत्र वाडा लावगण येथे वतनावर ठेवून बाकीचे एक वडील वएक कनिष्ठ असे दोन चतुर्बेटात राहिले. पुढे वडील मुलगा वाडा उंबर येथे ठेवला व तिसरा कनिष्ठ धामेळ येथे ठेवला. धाकटीचे दोन मुलापैकी वडील मुलगा वाडा गावाण येथे राहिला व धाकटा केळ्ये येथे गेला व तेथे त्याने देशमुखीचे वतन मिळविले.”
“कोतवड्यास सहस्रबुद्धे यांचे बारा वाडे आहेत. बाबाचे खापरपणजोबा (बाळाजी) कोतवड्याजवळ धामेळवाडी येथे राहात असत. त्यांची दोन जोती अद्याप चांगल्या स्थितीत शिल्लक आहेत. या घरांचे पिछाडीला नाला आहे. त्या नाल्यापलीकडे टेकडी आहे. त्या टेकडीचे पायथ्याशी ही जोती आहेत. कोतवड्यापासून धामेळवाडी मैल-दीड मैलावर आहे.”

“बाळाजी विष्ण हे श्री परशुरामभाऊ पटवर्धन यांचे खाजगी कारभारी होते. त्यांनी नोकरीसाठी कोतवडे सोडले. त्यांनी अनेक सहस्रबुद्धे मंडळींना पेशव्यांचे नोकरीत लावले. पुढे पटवर्धन-पेशवे लढ्यात सन १७९६ मध्ये पेशव्यांनी त्यांना कैद केले. १७९९ मध्ये परशुरामभाऊ वारल्यानंतर श्री. बाळाजी विष्णु यांचे सरकारी दरबारातील महत्त्व कमी झाले. बाळाजींचे भाऊ केसो विष्णु यांनी आपले घराजवळ धामेळवाडी (कोतवडे) येथे एक देवालय बांधले. १७९९ नंतर बाळाजी विष्णु यांनी कोतवडे कायम सोडले व ते इचलकरंजी संस्थानात तासगाव येथे राहिले. १८४६ पर्यंत हे घराणे तेथेच असे. १८०९ मध्ये बाळाजी विष्णुचे निधन. आबाजीही तासगावी राहिले. त्यांचे चिरंजीव विठ्ठलपंत यांची इचलकरंजी संस्थानातील बोरगावाजवळ मौजे राजुरी येथे १०८ एकर जमीन होती. विठ्ठलपंतांचे दुसरे चिरंजीव नारायण पानी १९०० मध्ये कुरुंदवाड येथे घर बांधले व तेथे स्थायिक झाले.

२) माधव वासुदेव सहस्रबुद्धे – गीतगंगा सोसा., कर्वेनगर, पुणे-५२ यांचेकडून

“विष्णुपंत सहस्रबुद्धे हे मांत्रिक होते. नारायणराव पेशव्यांचे भूत गाडण्याचा प्रयत्न करणारे. यांना याबद्दल एक हजार फटक्यांची शिक्षा झाली होती. अंगाचा दाह असह्य झाल्यामुळे मुठा नदीत शिरून त्यांनी देहत्याग केला.”

३) वसंत वामन सहस्रबुद्धे, पुणे

‘तीन घराणी कोतवडे गाव सोडून सुमारे १८७० च्या सुमारास सांगली येथे आली. यांना पुढे सांगलीकर पटवर्धनांनी सरंजाम (तैनानी जमिनी) दिला. या घराण्याचे मूळ पुरुष त्र्यंबक, सरदार पटवर्धन यांचेसह कोतवड्याहून सांगलीत आले.”

(४) अच्युत गोविंद, आनंद मुद्रणालयाशेजारी, सदाशिव पेठ, पुणे

“पूर्वज सदाशिव हरि यांचेकडे पेशवे दप्तरातून मौजे कांदळी, तालुके शिवनेर येथील मोकासा अंमल काही वर्षे चालू होता. तो नंतरच्या पेशवे अंमलात रद्द झाला होता. इसवी सन १८०९/ १८१० सालामध्ये तो बाजीराव रघुनाथ यांनी परत त्याच घराण्यात पाच पुरुषांस सरंजाम दिला. तो अव्वल इंग्रजीत सुटला. एलफिनस्टन साहेबांनी त्यांचा हिस्सा परत वंशपरंपरेने परत दिला. ता. १७.१२.१८५६ नं. ४२ या पत्रातील कलम १७ यात ठराव करून ११ मे १८५८.”

“सरंजाम नं. १४४३

मेहेरबान दोस्त गणेश पवर्तराव सलाम दिगर

आबीसाब ग्रिफित साहेब कमिशनर उत्तरभाग सलाम दिगर मौजे कांदळी तालुके – शिवनेरी येथील मोकासा अंमल तमचे घराण्यातील सदाशिव हरि यांचेकडे पेशवे अंमलात काही वर्षे चालून जप्त झाला होता तो इसवी सन १८०९ – १० सालामध्ये बाजीराव रघुनाथ पेशवे यांनी खाली लिहिलेले पाच पुरुषांस सरंजामास दिला.

१) पर्वतराव सदाशिव १) बळवंत सदाशिव १) बहिरो विठ्ठल २) अनंतराव विठ्ठल १) भिकाजी हरि”

सरंजाम चालविण्याविषयी सरकारांतून कायदा ठरला आहे त्याप्रमाणे सदरहू सरंजाम पहिले कलमात लिहिलेले पाच पुरुषांकडे अव्वल इंग्रजीत सुटला होता. त्याचे हयातपर्यंत एकाचा हिस्सा त्याजकडे चालवून पुढचे पुरुषास निम्मे पेन्शन असे प्रकारचा आहे.

तथापि सदरहू सरंजाम वंशपरंपरेने चालवावा म्हणोन एलफिस्टन साहेब यांनी शिफारस लिहून ठेवली आहे. सबब सरंजाम अव्वल इंग्रजीत वर लिहिलेल्या पाच इसमास सुटला. त्यापैकी दर एकाचा हिस्सा त्याच्याकडे वंशपरंपरेने चालवावा म्हणून कोर्ट डायरेक्टर यांनी ता. १७.१२.१८५६ नं.४२ चे पत्रातील कलम १७ यात ठरावा केला आहे.

सबब पर्वतराव सदाशिव याचा हिस्सा तुम्ही त्यांचे पुत्र म्हणोन तुम्हाकडे चालत आहेतो पर्वतराव सदाशिव यांचे वंशपरंपरेने चालवावा. म्हणोन सदरहू ठराव आपल्याला कळविला आहे. ता. ११ मे १८५८ इसवी हे. किताबत बाळाजी गणेश कारकून सदर १२.५.५८

५) ले. क. गजानन महादेव महाजन, सहकारनगर, पुणे

“अंदाजे १७७९ ते १७८० सुमारास कोतवड्याहून मूळ पुरुष आबाजी गणेश हे घाटावर आले व मिरजेस स्थायिक झाले. मिरजेस महाजन व शेट्ये अशी दोन वतने हाती. त्यातील महाजन हे वतन आमच्या पूर्वजास मिळाले व तेव्हापासून सहस्रबुद्धे महाजन झाले. या वतनास परगणा वतन म्हणतात.या वतनाचा मोडीतील कागद देत आहोत.’

(तो पान ६४२ वर दिला आहे.)

६) वसंत मधुसूदन सहस्रबुद्धे, हडपसर, पुणे

“आप्पा ऊर्फ रामचंद्र भानुदास काशीचे मोठे पंडित होते. वयाचे १५ व्या वर्षी घराबाहेर पडले व रास्ते, पटवर्धन, बोकील, यांचेबरोबर पुण्यास आले.

पुण्यात नारायणराव पेशवे यांच्या पेढीवर काम चालू केले व पुढे सरदार व कोतवाल म्हणून शहर बंदोबस्त करत. नंतर त्यांना जरीपटक्याचा मान मिळाला, वतन मिळाले. नंतर ते कोतवड्यास गेले. पुढे वतनात रत्नागिरीजवळ पेठागाव व चिपळूणजवळ केळीशी ही गावे मिळाली. पाच हजार सरदारांचा वतन मान मिळाला.”

नारायणराव पेशवे यांनी सरदार बापू खाजगीवाले यांचे मुलीशी (आनंदी) त्यांचे लग्न करून दिले. पुढे नंतर नगरला गेले. तेथे वाडा बांधला. नारायणरावांच्या खुनानंतर रघुनाथराव पेशवे झाले. पुढे त्यांना अटक झाली. नंतर बारभाई झाली. आबा पुरंदरे, विंचूरकर मामा, सहस्रबुद्धे (रामचंद्र), रघुनाथराव यांच्यावर नजरकैद. यासंबंधी. रघुनाथ पेशवेभट पेशवे दप्तरात व बखर यांच्यात नोंद आहे. सहस्रबुद्धे घराण्यातील पुढे १२ ते १७ शकात त्यांचे हाल झाले व पेणजवळ लढाईत मारले गेले. आप्पांनी कोतवडे गावी अंबाबाई व महालक्ष्मीचे मंदिर बांधले. आप्पांची मुले मोठी झाली. परंतु इंग्रजी राज्यात त्यांची वतने कायम झाली.

७) द. ना. सहस्रबुद्धे पुणे, यांचेकडील हस्तलिखित माहिती.

“श्री. शंकर उपाख्य अप्पाजीपंत हे दुसऱ्या बाजीरावाचे वेळी अहमदनगर येथे कमाविसदार पदावर होते. त्यांनी वाराणशीत जाऊन संन्यास घेतला व तेथेच देह ठेवला.”

‘मौजे मोडनिंब, अरण व करकंब येथे सहस्रबुद्धे घराणी आहेत. पैकी मोडनिंब घराण्याकडे मिरजेच्या पटवर्धन संस्थानापैकी मोडनिंब तालुक्याची फडणिशी वंशपरंपरा होती व तीनही गावच्या सहस्रबुद्ध्यांना तैनाती जमिनी होत्या. मोडनिंब येथील घराण्यास वारस पुरुष न राहिल्याने तेथीलच साठे घराण्यात तात्पुरती फडणिशी दिली. श्री अप्पाजीपंतांचे द्वितीय चिरंजीव गोपाळ यास परत ती फडणिशी दिली. श्री. गोपाळ यांनी वयाच्या ६०/६५ पर्यंत तेथे काम केले.’

८) चिंतामणी सहस्रबुद्धे द्वारा पंचायत समिती बी.डी.ओ. रत्नागिरी, १९६३ चे पत्र.

रावसाहेब सहस्रबुद्धे यांच्या वंशवृक्षातले आहेत. “हरि विष्णुचे आपण वंशज. चुलत घराण्यातील बाळाजी विष्णु हे प्रथम परशुरामभाऊ पटवर्धन यांचेबरोबर घाटावर आले. त्यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू हरि विष्णु आले. बाळाजी विष्णु हे पेशव्यांचे कारभारी होते.

दुसरा बाजीराव नादान आहे म्हणून त्यास काढून त्याचा अल्पवयीन धाकटा भाऊ ‘चिमाजीअप्पा’ यास गादीवर बसवावे म्हणून जो कट झाला त्यात सामील झाल्याच्या आरोपावरून बाळाजी विष्णु यांस २५००० रु. दंड झाला व हरि विष्णु यांस ५० फटक्यांची शिक्षा झाली व कानास चाप लावून कान तोडला. अशा अर्थाची पत्रे उपलब्ध आहेत. हा प्रकार १७९८ च्या दरम्यानचा आहे. त्यामुळे आपले घराणे मागे पडले.

९) माधव वासुदेव सहस्रबुद्धे, कर्वेनगर, पुणे

नारायणराव पेशव्यांचे भूत गाडण्याचा प्रयत्न विष्णुपंत सहस्रबुद्धे यांनी केला. ते मांत्रिक होते. त्यांना या प्रयत्नाबद्दल एक हजार फटक्यांची शिक्षा झाली. अंगाचा दाह असह्य झाल्याने ते मुठा नदीत शिरले व तेथे त्यांचे देहावसान झाल.

१०) केशव विनायक सहस्रबुद्धे, चिंचवड (मोडनिंब घराणे)

भानुदास सहस्रबुद्धे हे मूळ पुरुष. त्यांच्या आधी पाच पिढ्या होत्या असे सांगत. ते शास्त्री होते. वेदपाठक होते. गणित, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांचा अभ्यास ह काशी-वाराणशी येथे २०/२५ वर्षे वेदपठण केले. नंतर ते जमखंडी येथे आले. रावसाहेब पटवर्धन राजे यांचेकडे १५ / २० वर्षे होते. त्यानंतर त्यांनी पुणतांबे गाव, जि. अहमदनगर येथे वेदपाठशाळा चालविली. त्यांना पटवर्धन सरदार यांच्या नात्याच्या मुलीशी लग्न करून दिले. भाऊसाहेब राजे पटवर्धन यांचे वडील कोतवडे या ठिकाणी राहत होते. भानुदासाचा जन्म सन १६८०, मृत्यू १७६५. पुणतांबे येथे यांची समाधी गोदातटाकी आहे. चिरंजीव रामचंद्र भानू सहस्रबुद्धे ऊर्फ अप्पा जन्म १७२५, मृ. १८०३ पेशवाईत सरदार होते. पेशव्यांच्या काळात राघोबादादा पेशवा नारायणरावच्या वेळेपासून ते आले. बारभाई कारस्थानात नारायणरावाच्या खुनात त्यांना (राघोबांना) देहांत प्रायश्चित्त झाले. राघोबा- आनंदीबाई नगर-कोपरगाव या ठिकाणी नजर कैदेत होते. त्यांचेबरोबर हेही होते. ते सरदार होते. त्यांचा वाडा होता. पेशवाई कादंबरीत याचा उल्लेख सापडतो.

११) दत्तात्रय मधुकर सहस्रबुद्धे, पुणे

आप्पा ऊर्फ रामचंद्र भानुदास हे पटवर्धन यांच्याबरोबर पुण्यास आले तेव्हा १५ वर्षांचे होते.

पुण्याचे पेशवे नारायणराव यांच्या पेढीवर काम चालू केले व पुढे ते सरदार, कोतवाल व शहर बंदोबस्त करीत. त्यांना जरीपटक्याचा मान होता. त्यांना वतन मिळाले होते. नंतर ते कोतवड्यात परत गेले. त्यांना पाच हजारांचा सरदारांचा वतन मान मिळाला.

नारायणराव पेशवे यांनी त्यांचे लग्न करून दिले. सरदार नारायण ऊर्फ बापूखाजगीवाले यांची मुलगी आनंदीबरोबर. नतर नगर येथे गेले. वाडा बांधला. वडील भानू यांचे निधन झाले. नारायणरावांच्या खुनानंतर रघुनाथराव पेशवे झाले. त्यांना पुढे अटक झाली. नंतर बारभाई झाली. आबा पुरंदरे, विंचूरकर मामा, अप्पा सहस्रबुद्धे (रामचंद्र), रघुनाथराव यांच्याबरोबर नजर कैद -रामशास्त्रीचे फर्मान. रघुनाथ पेशवे भट पेशवे दप्परात व बखरीत याची नोंद आहे. पुढे १२ ते १७ शतकात त्यांचे हाल झाले व पेणजवळ लढाईत मारले गेले. त्यांचा सेवक सखाराम महादा वाघ यांनी त्यांच्या घराण्याचा सांभाळ केला होता. आप्पांनी कोतवडे गावी “अंबाबाइ व महालक्ष्मी मंदिर बांधले. यांचे मुलगे गोविंदा व कृणा हे कोतवड्यास राहिले. या नोंदी नाशिकला शास्त्रीभाऊ जोशी यांच्याकडे मिळल्या.

१२) यशवंत नारायण, ८१० सदाशिव पेठ, पुणे.

भा.शकर उपाख्य आप्पाजीपंत हे दुसऱ्या बाजीरावाच्या वेळी अहमदनगर येथे कमाविसदार होते. (ना. सं. इनामदार यांच्या ‘मंत्रावेगळा’ या कादंबरीत याचा उल्लेख आहे.) श्री. आप्पाजीरावांनी वाराणशीस जाऊन संन्यास घेतला. तेथेच त्यांचे देहावसान झाले.

१३) वसंत गणेश सहस्रबुद्धे, नवी पेठ, पुणे

पेशवाईच्या उत्तरार्धात नाना फडणीसांचा बारभाई कारभार चालू होता. त्यावेळी भोरचे पंतसचिव श्रीमंत शंकरराव रघुनाथराव यांच्या पदरी रंगो रामचंद्र व दादो रामचंद्र हे दोघे बंधू नोकरीस होते. श्रीमंत शंकरराव विश्रांतीसाठी जेजुरीस राहिले असताना त्यांच्यावर कोणीतरी मारेकरी घातले. त्या कठीणप्रसंगी त्या दोघा बंधूंनी श्रीमंत शंकररावांचे प्राण वाचविले. चकमकीत दादोजी कामास आले आणि रंगोजी घायाळ झाले. या त्यांच्या कामाची बक्षिशी म्हणून पटवर्धन यांनी रंगोजीस किल्ले कठीणगड येथे वर्षाला शंभर रुपयांची नेमणूक केली. त्यासंबंधी एक सनदही होती. भोर संस्थानच्या इतिहासात वरील घटनेचा उल्लेख आढळतो. रंगोचा जन्मकाल १७७५ च्या सुमारास असावा.

१४) मनोहर वासुदेव सहस्रबुद्धे, बुरंबाड

बुरंबाड येथील सहस्रबुद्धे कुळ वंशजांचे मूळ पुरुष बल्लाळ. सन. १८६० चे दरम्यान पेशवे यांचे इच्छेनुसार लढाई क्षेत्रातून मिळेल ती संपत्ती घेऊन आले. त्यानुसार श्री. बल्लाळ उंटावर मिळेल ती संपत्ती घेऊन गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन सागर व नदीकिनारा मार्गाने जयगड, नांदिवडे, राई तिसंग करत गडनदी किनारमार्गाने चांगली जमीन व पाण्याची सोय पाहात पाहात सध्याच्या बुरंबाडचा भाग वस्ती करण्यास उत्तम ठरवून तेथे राहिले.

१५) वामन श्रीधर, कुर्ला, मुंबई ७०

शिवकालात एक सरदाराचे ठाणेदार म्हणून सुरत लुटीनंतर बागलाण (पूर्वीचे नाव वाघबन) जि. नाशिक स्थानांतर बागलाण तालुक्यात असखेड, मोसम नदीचे काठी. या कुटुंबास सरदाराकडून जमीन इनाम म्हणून मिळाली होती. या कुटुंबाने नाशिकजवळ भगूर येथे लक्ष्मीनारायण मंदिर श्रीपूरकडे (ता. बागलाण) पाण्याचा तलाव, नागाव ता. साक्री, जि. धुळे येथे देवीचे मंदिर तर दधेश्वर (ता. सटाणा) येथे महादेवाचे मंदिर बांधले. सहस्रबुद्धे यांचे दुधेश्वर म्हणून प्रसिद्ध. पेंढाऱ्यांच्या लुटीच्या काळात (डलहौसीचा काळ) असरखेड वाडा पेंढाऱ्यांनी लुटला व तेथे वस्ती केली.

१६) लीला नारायण सहस्रबुद्धे, मिरज

सहस्रबुद्धे यांना कोतवड्याहून पुण्यास नेले. पुण्यास पेशवे यांचेकडे नोकरी दिली. तेथे वाडा बांधून दिला. पुढे रास्ते यांनी तो वाडा जाळला तेव्हा १७३४ मध्ये बाजीराव पेशव्यांनी वाडा बांधण्यास जागा दिली. १८०३ पर्यंत आमचे वंशज पुण्यास राहात. १८०३ मध्ये होळकर, रास्ते, गोखले यांनी वाडा लुटला. तेव्हा सांगली संस्थानिक यांचे नातू हरभटजी पटवर्धन यांनी आमच्या पूर्वजांना सांगलीस आणले. तेथे खाडिलकर गल्लीत मोठा वाडा बांधला. १८१६ साली माझ्या खापरपणजी सासूबाई सती गेल्या. तेथे देऊळ आहे.

श्रीमंत राजे साहेब. सांगली यांनी उगार खुर्द येथे १०५ एकर जमीन, घर, तसेच शिरगोपीस ४५ एकर रानजमीन इनाम दिली (सन १८१८).

पुण्याच्या घराची वास्तुशांत झाली त्यावेळी बाजीराव पेशवे यांनी उजव्या सोंडेचा पंचधातूचा गणपती दिला. सांगलीचे राजे उगारला येऊन या गणपतीवर अभिषेक करून जात. कै. रामचंद्र रघुनाथ यांची कोतवड्यास समाधी आहे. १८८४ साली या मूळ पुरुषाचे शेवटले श्राद्ध झाले.

१७) बाळकृष्ण विनायक, भांडुप, मुंबई ४२
The Secretary of state in council To

गणेशभट बाळंभट सहस्रबुद्धे

ब्रिटिश सरकारशी Loyal राहिल्यामुळे तुम्हास व तुमच्या वंशजांना वार्षिक Allowance १४४ रु.

Continuable to the lineal male hairs male descent from काशिनाथशास्त्री विठ्ठलशास्त्री सहस्रबुद्धे.

ही सनद २५ ऑक्टोबर १८७५ सालची आहे. मोडी व त्यासमोरच्या पानावर इंग्रजी आहे.

१८) Dy. Alienation Setllement Officer सरंजामे बडोदे

सरंजामे हे मूळचे कोतवड्याचे सहस्रबुद्धे. साधारण १५४० च्या सुमारास गणेशभट यांनी कोतवडे गाव सोडून ६ कि.मी. दक्षिणेस केळ्ये-मजगाव येथे स्थलांतर केले व नवीन मिळकत मिळवून घर बांधले. याच गणेशभट यांच्या वंशात आठव्या पिढीत लक्ष्मण बल्लाळ यास जनार्दन नावाचे अपत्य झाले. जनार्दन यांचे काही शिक्षण कोकणात, तर काही पुणे येथे झाले. साधारण बेताचे शिक्षण झाल्यावर जनार्दनने पेशवे दरबारी नोकरी पत्करली. पेशव्यांच्या राज्यव्यवस्थेतील एक महत्त्वाचे खाते “इनाम सरंजामे’ होते ते त्यांना देण्यात आले. तेव्हापासून सहस्रबुद्ध्यांचे सरंजामे झाले. जनार्दनपंतास पेशवे सरकारकडून सालीना १२००० ची नक्त नेमणूक शिवाय पुणे जिल्ह्यापैकी वडगाव घेनप हे गाव इनाम चालत होते. म्हणजे सरंजामी आणि इनामदार असेही त्यास म्हणत. हा गाव अलिजा बहादूर शिंदे सरकार यांनी सन १८०० मध्ये इनाम दिला होता. जनार्दनपंत यांनी पेशवे दरबारची आमरण सेवा करून आपला देह १७३० साली ठेवला. त्यांचे मरणोत्तर सदरहू गाव जप्त होऊन तो पुढे चालवावा की नाही, असा प्रश्न उभा राहिला. शिंदे सरकारानी ताकीदपत्र महादजी सूत – दौलतराव शिंदे या शिक्याचे चदं १५ माहे जिल्हेम या महिन्याचे दिले ते खालीलप्रमाणे :

“हा गाव रा. प्रभाकर जनार्दन सहस्रबुद्धे पुणेकर निसवत श्रीमंत राजश्रीपंतप्रधान स्वामी याजकडे सरकारातून आहे. तेथील जप्ती साल गुदस्त सन पीसा मया नेमत श्रीमंत सरकारातून लक्ष्मणगीर याजकडे सांगितली होती. ते हल्ली जप्तीची मोकळीक करून मौजे मजकूर पेटा नियमाप्रमाणे मशार जिल्हे कडे दिला असे.” परंतु पुढे इंग्रज सरकारने यांनी ठराव नं. १६१९, ३१ ऑगस्ट १८२९ चा केला आणि हा गाव प्रभाकर जनार्दन यांचे हयातीनंतर खालसा करण्यात आला.

१९) श्रीपाद रघुनाथ सहस्रबुद्धे, मिरज

आमचे मूळ घराणे हे रत्नागिरी जिल्ह्यात कोतवडे (बुद्रुक) येथील असून आमचे मूळ पुरुष साधारण १६५० च्या सुमारास असल्याचा उल्लेख कागदोपत्री मिळतो. त्यांचे नाव सदाशिव रामचंद्र ऊर्फ आप्पा सहस्रबुद्धे असे होते. ते श्री गणपती भक्त होते. यांची समाधी कोतवड्यात आहे. त्यास श्री सहस्रबुद्धे महाराज यांची समाधी म्हणतात. दररोज पूजा, आरती, वार्षिक श्राद्ध यासाठी खूप मंडळी जमतात. असो. आम्ही सहस्रबुद्धे खोत म्हणून ओळखले जात होतो. सावकारी, शेती हा आम्हा घराण्याचा धंदा. एकदा काही लोकांनी आमचे पूर्वजांबद्दल तक्रार केली की, सहस्रबुद्धे जास्त व्याज घेतात. त्यावेळी कोकणात सिद्दीचा अंमल होता. त्यावेळी न्याय नव्हता. त्यांना पेवात घालण्याची आज्ञा झाली. तीन दिवस त्यांनी समाधी अवस्थेत काढले.

त्याच दिवशी पेवाचे दार उघडून पाहावे अशी सिद्दीने आज्ञा दिली तो काय चमत्कार ? ३ दिवस ताटात दहीभात, पाण्याचा तांब्या हे दृश्य पाहाण्यास मिळाले. ज्यांनी तक्रारी केली त्यांना कठोर शिक्षा झाल्या. श्री. हरभट बाबा पटवर्धन हे आमचे कोतवड्याचे. आई वडिलांची अतिशय गरिबी. एकवेळ जेवावयास मिळणे कठीण होते. तेही गणपती भक्त होते. १२ वर्षे दुर्वांचा रस पिऊन त्यांनी श्री गणपतीची मनापसून भक्ती, उपासना केली. त्यामुळे ते वेदात पारंगत झाले. चारित्र्य, अतिशय तेजस्वी व नि:स्वार्थी ह्यांनी आमचे उपाध्येपण साधारण सन १६७५ झाली स्वीकारले. श्रीहरभटाचे चिरंजीव, नातू पणतू व खापर पणतू यांनी कोतवडे, पुणे सांगली व उगार खुर्द (कर्नाटक) वेळोवेळी धार्मिक कृत्य आमचेकडे केली म्हणजे आम्हा सहस्रबुद्धे व पटवर्धन यांचा संबंध यजमान-उपाध्ये असा आला. पुढे श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी १७३४ साली शनवारवाडा बांधण्याचे काम चालू केले. त्यावेळी आमचे घराणे पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यामुळे श्री. सदाशिवराव यांना बोलावून पुण्यास एक बखळ वाड्यासाठी दिली.

तेथे वाड्याचा पाया खणत असताना १० सोन्याचे कुंभ मिळाले, परंतु श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी ते तुमचेच आहेत, वाडा बांधा व आनंदाने पुण्यास रहा असे सांगितले. त्यामुळे आमचे घराण्यातील काही पुण्यास राहाण्यास आले. तेथेही सावकारी व्यवहार चालू होता. १८०३ साली होळकर यांनी पुण्यावर स्वारी केली. त्यावेळी श्री. रास्ते, गोखले, नातू आणि सहस्रबुद्धे यांचे वाडे लुटले व (१९४८ ची आवृत्ती) जाळपोळ झाली. पुढे श्री. हरभटजींचे नातू, पणतू, तलवार बहादूर श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी आम्हास १८०३ साली सांगलीस आणले. तेथे आमच्या पूर्वजांनी श्री. कृष्णाजी गणेश सहस्रबुद्धे यांनी खाडिलकर गल्लीत वाडा बाधला. तेथे आमचे पूर्वज राहत होते. त्यावेळीही आमचा सावकारी धंदा होता. श्री. हरभटजींचे नातू पुढे पेशव्याचे सरदार बनले. उदा. परशरामभाऊ पटवर्धन तासगाव, चिंतामण पटवर्धन सांगली, आप्पासाहेब पटवर्धन कागवाड आदी. यांनी हैदर, निजाम व महत्त्वाच्या लढाईत पराक्रम गाजविला. त्यामुळे पेशव्यांनी त्यांना सांगली, मिरज, जमखंडी, बुधगाव, कुरूंदवाड, ऐनापूर इत्यादी जहागिरी दिल्या. पुढे ब्रिटिश सरकारशी तह होऊन हे संस्थानिक बनले. ज्या श्री. चिंतामणरावांनी आम्हास सांगलीस आणले ते वेळोवेळी धार्मिक कार्यासाठी आमचेकडे येत असत. त्यांना फार वाटावयाचे की आपले व सहस्रबुद्धे यांचे संबंध उपाध्ये व यजमान अशा त-हेचे आहेत. यांनी काही तरी आमचेकडे मागावे, परंतु वंशज नि:स्वार्थी होते त्यांनी प्रत्येक वेळी आपली कृपा व आशीर्वाद असावा असे मागितले. पुढे १८१६ साली सांगलीनजीक वारणा व कृष्णा संगमावर आमच्या आजोबांची आजी सती गेली. त्यावेळी श्रीमंत चिंतामणराव हजर होते. तिथे हरीपूर रोडजवळ लोखंडी पुलासमोर सतीचे देऊळ आहे. आमची बरीच वेळा परीक्षा पाहिल्यावर आम्हास उगार खुर्द, शिरगुप्पी येथे अनुक्रमे ७० एकर व ३५ एकर रानव तसेच उगारातघर सनद १८१८ साली करून दिली व सनदीत या इनामाचा उपभोग सूर्यचंद्र असेपर्यंत तुम्ही घ्यावयाचा आहे. त्यामुळे आम्ही सहस्रबुद्धे इनामदार म्हणून प्रसिद्धीस आलो. उगार व सांगलीस जाणे चालू झाले. श्रीमंत चिंतामणराव व त्यांचे चिरंजीव धुंडिराज पटवर्धन हे वेदशास्त्र पारंगत होते. शिरगुप्पी, कुसामाळ, मोळवाड, उगार ही सांगली संस्थानची गावे. येथे चातुर्मासात अनुष्टाने करीत. त्यावेळी आमच्या उगारात ते नदीकाठी मठात राहात.

ऐतिहासिक कागदपात्रे